मठगाव तालुका भुदरगड येथील पुरातन महादेव मंदिर:
गावकऱ्यांनी दिला सतत 23 वर्षे लढा: मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा
सिंहवाणी विशेष
किशोर आबिटकर ( वरिष्ठ पत्रकार)
राष्ट्रीय अध्यक्ष
द पॉवर ऑफ मिडिया
मठगाव गाव हे भुदरगड तालुक्यातील एक डोंगरी दुर्गम गाव या गावात श्री महादेव महादेवाचे पुरातन जागृत देवस्थान आहे मात्र याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवभक्तांना नाही हे मंदिर वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी सतत 23 वर्षे लढा दिला हे मंदिर आता जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.
गावकऱ्यांनी ही यासाठी आता एक दिलाने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.
मठगाव येथील महादेव मंदिर दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने आतापर्यंत या मंदिराची माहिती महाराष्ट्रातच काय पण भुदरगड तालुक्यातील अनेकांना नाही. हे मंदिर शेकडो वर्ष पुराने असून जागृत असल्याचे सांगितले जाते गेल्या तीनशे वर्षात दोनदा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र महादेवाच्या कृपेने आजही हे मंदिर आहे.
मंदिराचा थोडक्यात इतिहास
गेल्या अनेक शतकापासून कलाकुसर आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले महादेव मंदिर मठगाव येथे आहे. पूर्वी पाटगाव, रांगणा , मठगाव परिसरात मोठी वर्दळ असायची. छत्रपती शिवाजी महाराज दीक्षिण दिग्विजय मोहिमेस निघाले असता पाटगावच्या मौनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाटगाव येथे मुक्कामी होते, त्यावेळी महाराजांचे पाय या मंदिरास लागल्याचे परिसरातील बुजुर्ग सांगत असत.
मठगावच्या मंदिरास दोन तीनशे वर्षांपूर्वी जाण्यासाठी रस्ते होते. लोकांचे जाणे येणे होते. पण हणमंता घाट. रांगणा घाटाचे अस्तित्व संपल्यानंतर या भागातील लोकांचा वावर कमी झाला. हा दुर्गम भाग अतिदुर्गम होत गेला.
मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात झाले असल्याचे जाणकारांचे मत आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम दगडात सुबक कोरीव काम केलेले असे होते. मंदिराचा बांधकाम आकार खूप मोठा होता. त इतके पुरातन व इतिहास प्रसिद्ध मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात नाही मात्र कालांतराने हे मंदिर दुर्लक्षित होत गेले या पिढीला या मंदिराची माहितीच नाही.
या मंदिरावर सतराव्या शतकात मुघल सैन्याने हल्ला करून मंदिर उद्ध्वस्त केले गाभारा पाडण्याचा प्रयत्न होत असताना गाभाऱ्यातून हजारो मधमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी मंदिर पाडणाऱ्यांवर हल्ला केला त्यांना पळवून लावले यामुळे मंदिराचा थोडा भाग आणि गाभारा सुरक्षित राहिला. पाडलेल्या मंदिराचा आकार आणि अवशेष आजही पाहायला मिळतात. कोरीव काम केलेल्या भल्या मोठ्या दगडी शिळा, खांब आजही पाहायला मिळतात मंदिराच्या आसपास जमिनीत गाडलेल्या दगडी तुळया, चबुतऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येतात.
मठगाव येथे महादेव मंदिर परिसरात श्री महादेव, श्री काळम्मा देवी, श्री सातेरी देवी अशी 11 पुरातन मंदिरे आहेत. त्यापैकी महादेव व काळमा मंदिराजवळ महादेवाची राई आणि काळमाची राई अशा दोन घनदाट देवराया होत्या. 1970 च्या दशकात भूमीहिनाना जमीन देण्याच्या शासकीय योजनेतून एका नालायक तहसीलदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून दोन कुटुंबातील 15 जणांना भूमीहीन ठरवत प्रत्येकी पाच एकर जमिनीचे वाटप केले. यापैकी महादेवाची राई व काळमती राई या दोन देवराया तुरंबे येथील मुल्लानी कुटुंबियाकडे गेल्या. त्यांनी येथील लाखो रुपयांची झाडे तोडून जंगल साफ केले.
मठगाव भूखंड लढा
मठगावकर ग्रामस्थांना आपण जंगल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सुरुवातीस भासवणाऱ्या तुरंबेकरांनी नंतर या जमिनीची मालकीच आमच्याकडे असल्याचे सांगत देवस्थान जमिनी कसणाऱ्या कुटुंबीयांना हाकलून लावण्याचे प्रयत्न झाले. गावकऱ्यांना मंदिरात येण्यास, पूजाअर्चा करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मठगाव ग्रामस्थ आणि संबंधित जमीन धारक यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. हे वाद भुदरगड पोलीस ठाण्यात आल्यानंतर परस्पर विरोधी तक्रारी सातत्याने सुरू झाल्या.
1985 च्या जुलै महिन्यामध्ये पाटगाव धरणाच्या सांडव्यास धोका निर्माण झाल्याची बातमी आल्यानंतर भुदरगडचे तत्कालीन फौजदार सूर्यवंशी हे पहाणी करण्यासाठी मला घेऊन पाटगाव कडे निघाले असता वाटेत संबंधित मुल्लानी भेटला त्यांनी हा विषय काढला. त्यानंतर फौजदार सूर्यवंशी मला म्हणाले मठगाव मध्ये देवस्थान जमिनीचा काहीतरी मोठा विषय आहे, लक्ष घाला.. यानंतर चारच दिवसात मठगाव ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ तहसीलदार आणि प्रांत यांना भेटण्यासाठी गारगोटीत आले असता त्यांची व माझी भेट झाली. या शिष्टमंडळामध्ये पंचायत समितीचे माजी उपसभापती बळवंत पाटील, माजी सरपंच श्रीपती आबा पाटील, यशवंत बाबुराव कोळगे नाना विष्णू पाटील, बाबुराव भाऊसो पाटील, बळवंत धोंडीराम पाटील, तत्कालीन सरपंच तुकाराम पांडुरंग मोरे, टी ए पाटील, सहदेव दाजी पाटील, राजाराम बचाराम पाटील, देवबा भिवा कांबळे, पांडुरंग आत्माराम कांबळे, धोंडीराम यशवंत पाटील आदी लोकांचा समावेश होता
त्यांच्याकडून मला या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी मुळाशी जाण्याचा निश्चय गावकऱ्यांच्या साथीने मी केला. या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यासाठी मी आणि मठगाव चे सरपंच मोरे, टी ए पाटील सुमारे दोन महिने प्रयत्न करत होतो. त्यानंतर या प्रकरणाची खोली लक्षात आली. कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्रात या बातम्या येऊ लागल्यानंतर मठगाव भूखंड प्रकरण हे उजेडात आले. त्यानंतर गावकऱ्यांच्या विलक्षण एकजुटीचा लढा सुरू झाला, तो सुमारे 17 वर्ष.. अखेर या प्रकरणी गावकऱ्यांना न्याय मिळाला. सरकारने गावकऱ्यांसारखा निकाल देऊन मंदिरे खुली केली. मंदिरांना नियमानुसार जमीन देऊन उर्वरित जमीन शासनाने जमा करून घेतली
मठगाव गावकऱ्यांकडे मंदिरे आल्यानंतर नियमित पूजापाठ, महाशिवरात्री सप्ताह, यात्रा असे विविध कार्यक्रम सुरू झाले. गावकऱ्यांनी एकजुटीने मंदिराची डागडुजी केली. त्यानंतर माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रयत्नातून मंदिरास क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळाली. वाहनतळ, मंडप सारखी कामे झाली. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणखी कामे सुरू झाली आहेत. मंदिरात पर्यंत जाणारे रस्ते झाले आहेत. या मंदिरात आता पर्यटकांना, यात्रेकरूंना जाता येत आहे.
पण अजून खूप टप्पा गाठायचा आहे. मंदिराचा जिर्णोद्धार व्हायचा आहे.. पूर्वी होते तसे मंदिर उभा केले जावे अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. पुरातत्व विभागामार्फत शासनाने हे मंदिर उभे करावे , पर्यटनाचा दर्जा वाढवून मिळावा, भक्तनिवास उभे राहावे, सरकार जमा झालेली या देवस्थानची जमीन मंदिरास मिळावी, महादेव मंदिर परिसरात असलेल्या सर्व मंदिरांना जोडणारे अंतर्गत रस्ते व्हावेत. या ठिकाणी मोबाईल फोनची कनेक्टिव्हिटी व्हावी, मंदिरास पुजाऱ्यांची नियुक्ती व्हावी, दिवाबत्तीची सोय व्हावी. कायमस्वरूपी वीज पाण्याची सोय व्हावी, अशी अनेक कामे शिल्लक आहेत.
यासाठी मठगावकर ग्रामस्थांना सर्व स्तरातून मदतीचे हात मिळायला हवेत, मठगावकरांच्या साथीने सर्वांनीच एक दिलाने प्रयत्न करायला हवेत, हीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो
शिवरात्र सप्ताह
मठगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवरात्री निमित्त मंदिरात प्रतिवर्षी सप्ताहाचे नियोजन करण्यात येत असते. यानुसार यावर्षीचा सप्ताह सुरू झाला असून शनिवार दिनांक 9 रोजी सांगता व महाप्रसाद झाला. जर सोमवारी मंदिरात पूजा अभिषेक केला जातो.
मडगाव महादेव मंदिरात कसे झाले
कोल्हापूर येथून गारगोटी- तांबाळे -मठगाव
निपाणी- गारगोटी- तांबाळे -मडगाव
आजरा- वेसर्डे – बशाचा मोळा
सावंतवाडी- गवसे- वेसर्डे -बशाचा मोळा
कोल्हापूरहून 84 किलोमीटर
गारगोटी हून 34 किलोमीटर
मठगाव कडे जाण्यासाठी एसटी बसची फारशी सुविधा नाही. गारगोटी येथून खाजगी गाड्या मिळू शकतात.
तांबाळे येथून चालत पाच किलोमीट