गारगोटीचा कचरा पाल घाटात : दुर्गंधी : रस्त्यावरून जाणी ही मुश्किल :
हनबरवाडी ग्रामस्थांचा विरोध
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी शहरातील कचरा गारगोटी गडहिंग्लज राज्य मार्गावर पालघटात टाकण्यात येत असून सदर कचरा अनेकदा रस्त्यावर विखुरलेला असतो. सुमारे 200 मीटर पर्यंत कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्यांना आणि हणबरवाडी गावच्या ग्रामस्थांना या कचऱ्याच्या त्रास होत असल्याने त्यांनी विरोध केला आहे. कचरा व्यवस्थापनात गारगोटी ग्रामपंचायत कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
गारगोटी शहराची लोकसंख्या कागदावर कमी आणि प्रत्यक्षात दुप्पट, अडीच पट असल्याने ग्रामपंचायतीच्या कुवती बाहेर पाणी, रस्ते, वीज, कचरा या गोष्टी जाताना दिसत आहेत. त्यातच ग्रामपंचायतीने नियोजन करून कामे केली नसल्याने त्याचा त्रास गारगोटीकर नागरिकांना होताना दिसतो. गावातील कचरा कुठे टाकावा. त्याचे व्यवस्थापन काय करावे? याबाबत कोणतीही नियोजन नसून ग्रामपंचायत आकुर्डे रोड, शेळोली रोड आणि गडहिंग्लज गारगोटी राज्यमार्गावर पाल घाटात कचरा उघड्यावर टाकत आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते, परिसर गलिच्छ होत आहे. या ठिकाणी भटकी कुत्री मोठ्या संख्येने जमा झाल्याने रस्त्यावर अपघाताचे प्रसंगही निर्माण होत आहेत.
गारगोटी ग्रामपंचायतीने कचऱ्याचे परिणामकारक व्यवस्थापन करावे, लोकांच्या जागृती निर्माण करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.